तुळस एक अत्यंत गुणकारी औषधी …
भारतीय समाजात तुळशीला मनाचे स्थान आहे. समुद्र मंथनातून जेंव्हा अमृत निघाले तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले ,त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते.प्रत्येकाच्या दरी तुळशी वृंदावन असतेच. नित्यनियमाने त्याची पूजा केली जाते. सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. देवळात परमेश्वराला तुळसीपत्र वाहिले जाते. पूजाविधीमध्ये एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्या ऐवजी तुळशीचे पान वाहिले जाते. श्रीकृष्णाला तुळस अत्यंत प्रिय असे मानले जाते.
पंढरपूरच्या विठोबाची पूजा करताना त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घालतात.तुळस हे लक्ष्मीचे रूप आहे असेही मानले जाते.
सत्यनारायणाच्या पूजेत एक हजार तुळशी पत्रे वाहून ते दिले जाते. देवाला नैवेद्य दाखवताना एक तुळशीचे पान नैवेद्यावर ठेऊन , दुसऱ्या तुळशीच्या पानाने नैवेद्य दाखवला जातो व नंतर ते पान देवाला वाहिले जाते. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या मृतदेहाच्या तोंडात, देहावर, कपाळ पट्टीवर आणि दोन्ही कानांवर तुलसीपत्र ठेवले जाते.
भारतीय समाजात तुळशीला एवढे मनाचे स्थान देण्याचे कारण तुळस ही औषधी वनस्पती आहे. ती आपल्या उच्छ्वासातून जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते त्यामुळे हवा शुद्ध होते. तुळस ही कफ नाशक व पाचक आहे. सर्दी, पडसे, कफ खोकला, दमा यावर तुळशीचा काढा अत्यंत गुणकारी आहे .तुळशीची पाने, आले व गुळ पाण्यात उकळवून हा काढा केला जातो.चहा, कॉफी ऐवजी तो पिणे अधिक चांगले. तुळशीची पाने जेवल्यावर खाल्यास पचन चांगले होते. तुळसी रस कायम प्राशन केल्यास मूत्रपिंडाची क्षमता वाढते. रक्तातील कोलेस्ट्रोल कमी होते. कोलायटीस , अंग दुखणे, सर्दी पडसे, पांढरे कडे, मेदवृद्धी,डोकेदुखी यावर तुळस गुणकारी औषध आहे. उचकी लागल्यास तुळशीची पाने खावीत. स्मरण शक्ती वाढण्यास तुळस उपयुक्त आहे. तुळशीच्या मंजिऱ्या म्हणजे तुळशीची फुले त्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. त्यात पाणी, दुध, साखर एकत्र करून प्यायल्यास लाघवी स्वच्छ होते.
वृन्दावनी, विश्वपुजीता, पुष्पसारा कृष्णजीवनी अशा नावाने ओळखली जाणारी तुळस ही एक झुडूप वजा वनस्पती आहे.ती ३-४ फुट इतकी उंच वाढू शकते. त्याला एक विशिष्ट सुगंध असतो. या रोपट्यावर भ्रमर झेपावत नाहीत , फुलपाखरे भिरभिरत नाहीत.आणि पाखरे आपली घरटी बांधत नाहीत.पंढरी तुळस आणि कृष्ण तुळस असे याचे २ प्रकार आहेत. त्यापैकी कृष्ण तुळस औषधी असते. तुळशीचे औषधी गुण आणि धार्मिक भाव यामुळे वारकरी संप्रदायात तुळशीला महत्वाचे स्थान आहे.
तुलसी विवाह ………
कार्तिक शुद्ध एकादशीपासून पोर्णिमे पर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळसी विवाह केला जातो. काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावतात. नित्यनियमाने तिला पाणी घालून वाढवतात. मग तिचा विवाह लावतात. या विवाहात तुळस ही वधू , बाळकृष्ण वर आणि उस हा मामा असे मानले जाते. त्यासाठी तुळसी वृंदावन रंगवून सुशोभित करतात. तुळशीभोवती रांगोळी काढतात, तुळशीच्या चारही बाजूने उस लावून उसाचा मांडव तयार करून , वृंदावनात उस , झेंडूची फुले , चिंचा, आवळे ठेवतात.
तुळशीच्या समोर पाटावर स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते. सायंकाळी सूर्य मावळल्यावर कृष्णाबरोबर अंतरपाट, मंगलाष्टक, मणीमंगळसूत्र , ओटीचे समान या साहित्यासामावेत सर्व विधीनुसार तुळशीचे लग्न लावले जाते.
या संबंधी एक कथा सांगितली जाते – जालंधर नावाचा राजा प्रजेला खूप त्रास देत असे. त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्य पुण्यामुळे विष्णूला जालंधरला मारणे अवघड होऊन बसले. तेंव्हा श्री विष्णूने जालंधराचे रूप घेऊन वृंदेच्या पातिव्रत्याचा भंग केला. त्यामुळे त्याला जालंधराचा वध करता आला. हे वृत्त वृंदेला समजताच तिने विष्णूला शाप दिला व ती स्वत: सती गेली. तिच्या मृतुच्या ठिकाणी एक वनस्पती उगवली , तीच तुळस. म्हणून विष्णूला तुळस प्रिय असते.असेही म्हणतात की पुढे द्वापार युगात याच वृंदेने रुक्मिणी होऊन याच कृष्णाशी कार्तिक शुद्ध द्वादशीला लग्न लावले. त्या वेळेपासून तुळसी विवाह प्रारंभ झाला असे म्हणतात.
सौ. रश्मी मावळंकर