प्रवास-स्नेहा सदाशिव शिंदे
अंगणातल्या पारिजातकाची फुलं वेचता वेचता सुधा काकू अगदी भान हरपून गेल्या होत्या. एक एक फुल हळुवारपणे त्या ओंजळीत साठवत होत्या त्या प्रत्येक फुलागणिक त्यांना कान्हाच्या मुरलीचे सुमधुर स्वर ऐकू येत होते.फुलं वेचता वेचता कधी त्या मुरलीधरात एकरूप होऊन जात हे त्यांचं त्यांनाच कळत नसे . चिमुकल्या हातांनी त्यांच्या सोबत माहीचं एक एक फुल वेचण आणि त्यांच्या पदराशी तिचं खेळणं सगळं त्यांना अगदी गोड स्वप्नावत भासे आणि त्या परमसुखात काकू अगदी तल्लीन होऊन जात .
माहीचं सतत त्यांच्या मागून दुडक्या चालीनं चालणं आणि इवल्याश्या हातांनी जवळ ओढणं अगदी आपलं बालपण नव्याने जगत असल्यासारखं वाटायचं सुधा काकुंना. माहीच्या येण्यानं त्यांचं घर अगदी सुखात न्हाऊन निघालं होत. समीर आणि जान्हवी दिवसभर ऑफिसात असायचे माहिचं सगळं करण्यात दिवस कसा जायचा कळायचं देखील नाही. आजी व नातीची छान गट्टी जमली होती,माहिला आंघोळ घालण्यापासून ते तिच्यासोबत बागेत खेळण्यापर्यंत सगळं त्या अगदी हौशीनं करायच्या .माहिला त्यांचा इतका लळा लागला होता की ती एकहि क्षण त्यांच्या पासून दूर राहू शकत नव्हती.दिवसेंदिवस माहीचं त्यांच्या इतकं आहारी जाणं जान्हवीला काही फारसं रुचत नव्हतं.
घरी आल्या आल्या जान्हवीनं तिचं नेहमीचं पुराण पुन्हा सुरु केलं ” तुझ्या त्या म्हातारीला वृद्धाश्रमात कधी सोडणार आहेस समीर?” “की मी आता माहेरी निघून जाऊ? ” ” तू काही बोलणार पण आहेस की नेहमी प्रमाणेच फक्त माझी बडबड ऐकुन गप्प बसणार आहेस?”समीर शांत पणे सगळं ऐकत होता काय करावं त्याला काहीच सुचत नव्हतं.एकीकडे आयुष्यभर खस्ता खाऊन लहानाचं मोठं करणारी आई तर दुसरीकडे जीवापाड प्रेम करणारी बायको. मनात विचारांचं वावटळ सुरु होत भावनांचं एकच काहूर माजलं होतं.सुन्न होऊन तो जान्हवीचं बोलणं ऐकत होता .जान्हवीची बडबड सुरूच होती ” तुझ्या त्या आईनं पोरीला अगदी डोक्यावर बसवलीय ,दोन मिनिटं सुद्धा तिला सोडून राहायला मागत नाही कार्टी .” ” समीर मी शेवटचं विचारतेय तू तुझ्या आईची व्यवस्था करतोयस कि मी माझी बॅग भरायला घेऊ ?”
समीरने आपल्या बॅगेतला अर्ज काढून जान्हवीच्या हातात ठेवला आणि सुन्नपणे आतल्या खोलीत निघून गेला .अर्ज पाहून जान्हवीचा आनंद गगनात मावेनासा झाला.पटापट तिने काकूंच सगळ सामान पॅक केलं आणि गाणं गुणगुणतच ती स्वयंपाक घरात शिरली.कधी एकदा सासू बाई येतील आणि कधी मी त्यांना कायमची घराबाहेर काढीन असं झालं होत तिला.
बागेत माही तिच्या चिमुकल्या दोस्तांसोबत खेळण्यात अगदि गुंग झाली होति .काकू त्यांच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारता मारता तिच्याकडे लक्ष ठेऊन होत्या.इतक्यात अचानक अवकाळी पावसाची रिपरिप सुरु झाली माहिला घेऊन काकू आडोश्याला धावल्या.पावसाची रिपरिप आता थोडी ओसरली होती अंधुकश्या प्रकाशात माहिला घेऊन काकू घरचा रस्ता चालू लागल्या. माहीच्या निरागस प्रश्नांना उत्तर देता देता कधी त्या घरापाशी पोहचल्या कळलं देखील नाही. घरी पोहचताच काकूंनी पाणी गरम केलं आणि माहिला अंघोळ घालून त्या माजघरात येऊन बसल्या. आता देवघरात जाऊन दिवा लावावा म्हणून त्या उठतात तोच जान्हवीने वृद्धाश्रमाचा अर्ज त्यांच्या हातात दिला.काकूंनी हसत मुखाने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे त्या देवघराच्या दिशेनं निघाल्या.देव्हाऱ्यातल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे त्या एकटक पाहत बसल्या. बासरी वाजवण्यात तल्लीन झालेल्या मुरलीधराची हसरी मूर्ती त्यांना खूप काही सांगू पाहत होती. सकाळी वाहिलेली पारिजातकाची फुलं आता पार कोमेजून गेली होती.आपल्या आयुष्यच सुद्धा काहीस असच आहे कधी एखाद्या फुलासारखं बहरलेल आयुष्य क्षणात निर्माल्य बनत, देवाच्या चरणाशी असलेल्या फुलांची जर हि अवस्था मग आपली तरी अवस्था याहून निराळी का असावी ? शेवटी आपण सुद्धा आयुष्यभर ह्या कान्हाच्या चरणाशीच तर आहोत.आयुष्यभर कुटुंबासाठी जगताना स्वतःचा विचार कधी केलाच नाही.कदाचित म्हणूनच कान्हानं एक वेगळं आयुष्य जगण्याची संधी आपल्याला दिली असावी.मनाशी कसलासा निर्धार करून त्यांनी देव्हाऱ्यातली मुर्ती उचलली आणि माजघरात आल्या .भरल्या डोळ्यांनी त्यांनी माहिकडे पाहिलं ती धावत काकूंपाशी आली त्यांच्या पदराला ओढत त्यांना खेळायला घेऊन चालली.काकूंनी तिला जवळ घेतलं तिला कुरवाळताना डोळ्यातल्या आसवांना त्या थांबउ शकल्या नाहीत. एकदा समीरला डोळे भरून पाहिलं आणि सामान उचलून त्या तडक वृद्धाश्रमाच्या दिशेनं निघाल्या.
“सुधा काकु s s अहो सुधा काकु s s फुलांऐवजी पानच गोळा करताय तुम्ही ” कुसुमच्या आवाजानं सुधा काकूंची तंद्री भंगली.भरल्या डोळ्यांनी त्यांनी एकदा कुसुमकडे पाहिलं आणि ओंजळीतील फुलं घेउन त्या कृष्णापाशी धावल्या. डोळ्यातले अश्रू काही थांबत नव्हते .माहीच्या आठवणीनं जिव अगदि कासावीस होत होता. “कान्हा का रे माझा अंत पाहतोयस? का इतकी कठीण परीक्षा घेतोयस? का मला माझ्या सुखापासून वेगळं करतोयस? का?” सुधा काकु मोठमोठ्यानं ओरडत होत्या. त्यांना होणारा त्रास पाहून कुसूमचे डोळे भरून आले ती काकूंचा हात हातात घेऊन त्यांना समजावु लागली.आश्रमातल्या त्यांच्या सगळ्या मैत्रिणी धावत काकूंपाशी आल्या.सगळ्यांनी मिळून त्यांना शांत केलं .
अगदी आठवड्या भरापूर्वीच काकु आश्रमात आलेल्या .तिन्ही सांजेची वेळ बाहेर कोसळणारा अवकाळी पाऊस. ओल्या चिंब काकू उराशी कृष्णाची मूर्ती कवटाळून थरथरतच आश्रमाच्या दारापाशी उभ्या होत्या .शरीरासोबत मन देखील अश्रुनी भिजलं होत कुसुमनं हसतच त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेली .काकूंचा स्वभाव तसा मनमिळाऊ दोनच दिवसात आश्रमातल्या बऱ्याच जणांशी त्यांची छान मैत्री जमली. कुसुम चा स्वभाव तर त्यांना फारच भावला होता, आणि कुसुम पण सतत काकू काकू करत त्यांच्या मागून असायची.आश्रमातल्या बऱ्याच कामात काकू तिला मदत करू लागल्या. हळु हळु तिथल्या माणसांमध्ये त्यांचं मन रमु लागलं.पण रोज सकाळी फुलं गोळा करायला गेलं कि काकूंच मन अस्वस्थ व्हायचं माहीच्या पायातल्या पैंजणांची छुमछुम तिचं त्यांच्या पदराशी खेळणं आणि त्यांच्या ओंजळीत एक एक फुल टाकणं सगळं सगळं आठवायचं त्यांना. ती भरली ओंजळ त्यांच्या आयुष्यच सुख होत .पण आता तीच भरलेली ओंजळ त्यांच्यासाठी एक जखम बनली होती. मग तासंतास त्या श्रीकृष्णापुढे भांडत बसायच्या, कित्येकदा तिथेच त्यांचा डोळा लागायचा.
हॉस्पिटलबाहेर समीर अस्वस्थ येरझाऱ्या घालत होता.डोळ्यासमोर तापान फणफणलेली पोरं आजीच्या नावाचा सारखा जप करत होती.काही दिवसांनि होईल सगळं निट असा विचार करून समीर आणि जान्हवी स्वस्थ होते.पण आज मात्र माहिची तब्येत जास्तच बिघडली. दिवसभर पोरीनं अन्नाचा कण देखील तोंडात घेतला नव्हता आणि अचानक संध्याकाळी ती बेशुद्ध होऊन पडली. धावत पळतच समीरनं हॉस्पिटल गाठलं होत माहिला ऍडमिट करावं लागलं.
मोकळ्या हवेत समीरला थोडं बर वाटत होत.प्रत्येक पावलागणिक विचारांची गती वाढत चालली होति.मनाशीच मनाचं द्वंद्व सुरु होत.कोणत्या हक्कानं आईकडे धाव घ्यावी ? आईला दिलेलं दुःख आठवून त्याची मान शरमेनं खाली झुकली. बराच वेळ विचार केल्यानंतर त्याने मनाशी काही ठरवलं आणि तो बाहेर निघाला.वृद्धाश्रम नजरेस पडताच त्याची पावलं जड झाली .आईच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत त्याच्यात नव्हती.भरल्या अंतःकरणाने तो हळू हळू पावलं टाकत गेट जवळ आला. आश्रमाच्या पायरीवर सुधा काकु देवासाठी वाती वळत बसल्या होत्या. मनात विचारांचं काहूर माजलं होत.माहिच्या आठवणीनं त्यांचा कंठ दाटून आला होता.तीला उराशी कवटाळण्यासाठी मन अधीर होत होतं.इतक्यात त्यांचं लक्ष गेटपाशी उभ्या असलेल्या समीरकडे गेलं.समीरन त्यांच्याकडं पाहिलं हातानेच काकुंनी समीरला जवळ बोलावलं. त्याला बाजूला बसवून त्याच्या पाठीवरून मायेन हात फिरवू लागल्या.समीरला हुंदका अनावर झाला आईला मिठी मारून तो रडू लागला.काकूंनी त्याला शांत केलं, समीरनं झाला प्रकार सविस्तर त्यांना सांगितला.सगळं ऐकून काकु सुन्न झाल्या.माहिच्या काळजीनं त्यांना गहिवरून आलं.घाई घाईनच त्या समीरसोबत हॉस्पिटलला जायला निघाल्या .
सुधा काकू माहिच्या डोक्यावरून मायेन हात फिरवत होत्या.माहिची अवस्था त्यांना पाहवत नव्हती.माहिचा हात हातात घेऊन त्या रडत होत्या. तिला उठवण्याचा प्रयत्न करत होत्या.बऱ्याच वेळानंतर माहि शुद्धीवर आली डोळे उघडून पाहते तर तिची लाडकी आजी तिच्याकडे पाहून हसत होती. माहि पट्कन उठून आजीला बिलगली , तिला कुशीत घेतल्यावर काकूंनी इतका वेळ रोखून धरलेले अश्रू अनावर झाले. आईच्या गालावरचे अश्रू पुसत समीरने दोघीना मिठी मारली. कोपऱ्यात बसून जान्हवी सगळं पाहत होती माहिला पाहून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
काकूंनी माहिला थोडं खाऊ घातलं तिच्या आवडत्या परीची गोष्ट ऐकता ऐकता ती झोपी गेली. माहिला अलगद मांडीवरून पलंगावर ठेवत सुधा काकु खोलीच्या बाहेर आल्या.समीर त्यांच्या मागोमाग बाहेर आला त्यांना अडवत त्यांची माफी मागू लागला. ” आई मला माफ कर , आपल्या घरी चल ” काकूंनी समीरकडे पाहून एकदा स्मितहास्य केलं आणि त्या हॉस्पिटल बाहेर पडल्या.
जड पावलांनी सुधा काकु वृद्धाश्रमाचा दिशेनं चालू लागल्या.मनात विचारांचा कल्लोळ सुरु होता. आपलं म्हण्यासारखं आता त्या घरात त्यांचं काहीच उरलं नव्हतं.आयुष्यभर कष्ट करून उभा केलेला संसार एका क्षणात परका झाला होता. चालता चालता मन भूतकाळात रमून गेलं.
घरच्याच्या विरोधाला न जुमानता काकूंनी जिद्दीनं प्रेमविवाह केलेला. संसार अगदी सुखात चालू होता. प्रेमाचे ते दिवस अगदी बहरलेले होते .समीरच्या जन्मानंतर काका काकू खूप खुश होते.सगळं अगदी छान चालू होतं. अचानक काळाने डाव साधला एका अपघातात काकांचा मृत्यु झाला. ऐन तारुण्यात नवरा गेला.समीर अगदी वर्षा दिड वर्षाचा होता, समोर पूर्ण आयुष्य होत. ना माहेरचे कोणी सोबत ना सासरचे तरीहि काकु खचून गेल्या नाहीत.त्यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली. त्यांच्या एका मैत्रिणीच्या ओळखीने प्राथमिक शाळेत त्यांना शिक्षिकेची नोकरी मिळाली. लहानग्या समीरला मैत्रीणीच्या घरी सोडुन काकु शाळेत जात.कधी एकदा शाळा सुटेल आणि समीरला डोळे भरून पाहीन असं त्यांना व्हायचं. बघता बघता दिवस सरत होते समीर मोठा होत होता.शाळा मग कॉलेज सगळं छान चालू होत.काकूंनी त्याला कधीच काही कमी पडू दिल नव्हतं.
म्हणता म्हणता वर्षे सरली समीर आता एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होता. काकूंची पण शाळेतून निवृत्ती झाली होती.सगळं काही छान चालू होत.काकु अगदी समाधानी होत्या त्यांच्या कष्टाचं चीज झालं होत.नेहमीच त्या ह्या गोष्टीच समाधान श्रीकृष्णापुढे व्यक्त करत असत.तासंतास कान्हासोबत गप्पा मारण्याचा त्यांना जणू छंदच जडला होता.
पुढे समीरचं लग्न झालं सुशिक्षित देखणी समजूतदार सून मिळाली म्हणून काकू खूपच खुश होत्या . काकूंनी अगदी तिला मुलीसारखं जपलं, जान्हवी पण काकूंना हवं नको सगळं पाहायची.घर सांभाळून नोकरीवर जायची,तिला संध्याकाळसाठी काकु काही काम बाकी ठेवत नसत. सगळं अगदी छान सुरु होत.नेहमी मैत्रिणींशी बोलताना काकु जान्हवीचं कौतुक करायच्या. आपली सून अगदी मुलीसारखी माया करते हे सांगताना त्यांचे डोळे पाणावायचे.
माहीच्या जन्मानंतर घर अगदी आनंदून गेलं, समीर, जान्हवी, काकू सगळेच खूप खुश होते. माहीच्या मागे दिवस कसा जायचा कळत देखील नव्हतं. पाच वर्ष कशी गेली कळलंच नाही, दिवसेंदिवस माहीची मस्ती तिचे हट्ट सगळं पुरवण्यात काकू अगदी रमुन गेल्या होत्या. आताशा जान्हवीचा स्वभाव खूप बदलला होता.सततची चिडचिड छोट्या छोट्या गोष्टींवर समीरशी होणारे तिचे वाद जान्हवीवर काढलेला राग सगळं त्यांना असह्य वाटे.कित्येकदा त्यांनी तिच्याशी ह्या विषयावर बोलायचा प्रयत्न केला पण जान्हवी काही तिच्या मनाचा थांगपत्ता लागू देत नव्हती.घरातले वाद वाढतच होते काकूंच सतत माहीसोबत असणं जान्हवीला खटकत होत. समीर तिला समजवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता, पण जान्हवीला कुणाचं काही ऐकूनच घ्यायचं नव्हतं. समीरची आतल्या आत खूप घुसमट होत होती.
एके दिवशी संध्याकाळी राधा काकू माहिला घेऊन बागेत जायला निघाल्या. कोपऱ्यापर्यंत पोहचतात त्यांना आठवलं त्या चष्मा घरीच विसरून आल्या होत्या. दारापाशी येताच घरातून येणाऱ्या भांडणाचे आवाज ऐकताच .त्या आल्या पावली माघारी फिरल्या त्यांना कळून चुकलं होत आयुष्याचा पुढचा प्रवास त्यांना वृद्धाश्रमाच्या दिशेनं करायचा होता.
धापा टाकतच काकू वृद्धाश्रमात पोहचल्या. कुसुमन पाणी देता देता माहीची विचारपूस केली.सगळं ठीक आहे सांगून काकू आपल्या खोलीत गेल्या. पाटावरचा श्रीकृष्ण स्मितहास्य करत उभा होता क्षणभर जणू काही आपल्याला तो हिणवतो आहे आपलं सुख हिरावून आपल्यावर हसतो आहे असं वाटून काकु जोरजोरात ओरडायला लागल्या.रडत रडत त्याला आपल्या दुःखाचा जाब विचारू लागल्या. मूर्तीच्या पायाशी डोकं आपटून घेऊ लागल्या.रडता रडता काकू बेशुध्द पडल्या कुसुमने लगेच डॉक्टरांना फोन लावला.
हळू हळू काकुंनी डोळे उघडले पायथ्याशी समीर हुंदके देत बसला होता.काकू हळू हळू उठून बसल्या हातानेच समीरला जवळ बोलावलं.त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला जवळ घेतलं. समीर हुंदके देऊन रडत होता. ” आई मला माफ कर खूप मोठी चूक झाली माझ्या हातून ,प्लिज मला माफ कर ” समीर काकूंना विनवणी करू लागला. काकु त्याला शांत करत होत्या. इतक्यात छोटी माही धावतच आत शिरली, आजीला बघताच धावत येऊन पलंगावर चढण्याचा प्रयत्न करू लागली. कुसुमने तिला उचलून पलंगावर ठेवली, माहि आजीला जाऊन बिलगली.जान्हवी दरवाज्यापाशी उभी होती आत येऊन बोलण्याचा धीर तिला होत नव्हता. इतक्यात काकूंच तिच्याकडं लक्ष गेलं. तिच्याकडे पाहून काकू हसल्या तिला जवळ बोलवलं. काकूंचे पाय पकडून जान्हवी रडू लागली.” आई मला माफ करा,माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला.मला माफ करा आई माफ करा “काकूंनी तिच्या डोक्यावरून मायेन हात फिरवला तिला जवळ घेऊन त्या समजाऊ लागल्या.”हे बघा बाळांनो चुका सगळ्यांकडून होतात पण त्या वेळेत सुधारण फार कमी जणांना जमत. आणि कोणत्याही चुकीसाठी पश्चापाइतकी मोठी शिक्षा नाही.” ” आईचा आपल्या मुलांवर कधीच राग नसतो त्यांच्या सगळ्या चुका ती पोटात घेते म्हणूनच तर ती एक आई असते.”काकूंच बोलणं ऐकून कुसूमचेहि डोळे पाणावले.
सुधा काकु आपल्या श्रीकृष्णाला उराशी कवटाळून भरल्या डोळ्यांनी आश्रमातल्या सगळ्यांचा निरोप घेत होत्या.माहि त्यांचा पदर पकडून त्यांच्या मागे मागे जात होती.सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू होते.वर्षानुवर्षे मुलांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या अनेक आजी आजोबांना काकूंचा हेवा वाटत होता. आज ना उद्या आपली देखील मुलं आपल्याला परत घेऊन जायला येतील या विचाराने कित्येक जण आनंदी होत होते.अखेर सगळ्यांचा निरोप घेऊन सुधा काकु घरी जायला निघाल्या. माहिचा हात हातात घेऊन त्या आश्रमाच्या पायरीपाशी आल्या.पायरीवर बसून कुसुम रडत होती काकूंनी तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि हसत मुखाने सगळ्यांचा निरोप घेऊन त्या घरी निघाल्या. आश्रमाच्या गेटपाशी उभी राहून कुसुम त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली….
- स्नेहा सदाशिव शिंदे
डोंबिवली
उत्तेजनार्थ पारितोषिक (कथा)
Thinkmarathi – स्पर्धा विशेषांक २०२१
pc:google