ज्वेल ऑफ म्हैसूर ©️स्नेहा भाटवडेकर

।।     श्री    शंकर   ।। 

मे महिना … पर्यटनाचा  हा महिना सलग दोन वर्ष अगदीच बंदिस्त चौकटीत , आपापल्या घरातच पार पडला. सुट्टीच्या केलेल्या विविध प्लॅन्स चा अगदी फज्जा उडाला. 
वैशाख वणव्याने पेटलेला गुलमोहोर आपली टपोरी रक्तवर्णी फुलं मिरवीत दिमाखात उभा आहे. माझ्या  घरातूनच मी त्याचे हे रूप न्याहाळतेय. हा गुलमोहोर  मला सारखा हिणवतोय. मे महिना ,सुट्टी आणि छोटा मोठा प्रवास हे आज अनेक वर्षांचं समीकरण  . सुट्टीचं आयोजन करायला अगदी जानेवारी पासून सुरवात. प्रवासाची तयारी मग ,कॅलेंडरची पाने अधीर होऊन उलटवत प्रवासाला राहिलेले दिवस मोजत राहायचे. कधी कौटुंबिक तर कधी Travel Company बरोबर सहल ठरायची. अश्या ह्या  प्रवासांत साथ असायची ती त्या भरगच्च फुललेल्या लालचुटुक  गुलमोहोराची. 

अरे हो , हा गुलमोहोर मला दोन वर्षं मागे घेऊन गेला. … 

विमानाने आकाशात उड्डाण केले, सहप्रवाशांबरोबर बेंगळुरूला कधी येऊन पोचलो कळलंच नाही. दुपारच्या रणरणत्या उन्हांत मिनी बस मधून आमचा प्रवास म्हैसूर च्या दिशेने सुरु झाला. 

वाटेत स्पेशल मधुर वड्याचा आस्वाद घेऊन म्हैसूर  मुक्कामी पोहोचलो. थोड्याच वेळांत गडगडाटांसह जोरदार पाऊस आमच्या स्वागताला हजर . त्याच्या आगमनाने आनंद तर झालाच पण पुढच्या स्थळदर्शनाबद्द्ल मन साशंक झालं . हा पाऊस आपल्या ट्रीपमध्ये  विघ्न तर आणणार नाही ना ?

सकाळी हवेतल्या गारव्याने लवकरच जाग आली . नेहमीच्या सवयीने प्रभात फेरीला बाहेर पडलो. हॉटेलच्या समोरच असलेला कोर्टाचा विस्तीर्ण परिसर मोठमोठ्या  हिरव्या वृक्षांनी वेढलेला होता. नवीन शहराचे दर्शन घेत पुढे जात असतांना अहाहा … गुलमोहोर आमची वाट पाहत उभाच होता. मातीचा लालभडक  रंग आणि वेगळ्या लाल छटेचा गुलमोहोर. गर्द हिरवी पाने. वळणदार काळभोर रस्ते. वाट इथे स्वप्नातील … रस्त्याच्या दुतर्फा अदबीने उभे असलेले ते गुलमोहोर . हे  वृक्ष ही ह्या शहराची विशेष ओळख. .ते दृश्य आजही नजरेसमोरून हटत नाही. म्हैसूर शहराचा हा भाग खूपच आवडला . 

लवकरच तयार होऊन sight seeing साठी बाहेर पडलो. आजचे  आकर्षण होते  Heritage Site ” Mysore Palace ” ( अंबा विलास पॅलेस).  म्हैसूर च्या वाडियार साम्राज्याचा राजमहाल. कर्नाटक राज्याचा महत्वाचा मानबिंदू. हिंदू यदुवंशीय साम्राज्याची राजधानी. सन १३९९ ते अगदी भारताच्या  स्वातंत्र्यानंतर सन १९५० पर्यंत श्रीकृष्णाच्या पूर्वजांनी इथे राज्य केले.  म्हैसूर त्यावेळी कर्नाटकचे सांस्कृतिक केन्द्र म्हणून प्रसिद्धीच्या झोतात होते. गायक वादक,नर्तक तसेच लेखक ,चित्रकार ह्या सारख्या विविध कलाकारांना  राजाचा उदार आश्रय लाभला होता. 

अगदी थोड्या वेळातच शहराच्या मध्यवर्ती भागांत असलेल्या  एका शानदार ,भव्य  राजवाड्याच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो. कडक Security check formalities नंतर गाईड बरोबर आम्ही त्या महालाशी येऊन त्याचे बाह्य सौन्दर्य न्याहाळू लागलो. 

विस्तीर्ण पटांगणावर उभ्या असलेल्या ह्या तीन मजली महालाची वास्तुशैली हिंदू,मुघल,राजपूत आणि गॉथिक ह्या सर्व पद्धतीचे एकत्र संमिश्रण आहे . ह्या महालाच्या बांधकामात ग्रे ग्रेनाईट चा वापर केलेला आहे आणि जवळजवळ पांच मजले इतकी उंची असलेल्या मनोऱ्यांसाठी गुलाबी संगमरावरचा उपयोग केलेला आहे . आजूबाजूचा सर्व परिसर सुंदर बगीच्यांनी सजला आहे. सर्व परिसर स्वच्छ आणि टापटीप  आहे. त्याची देखभाल उत्तम रीतीने केली आहे.  मन त्यामुळे एकदम प्रसन्न होते. उजव्या बाजूला चामुंडा देवीचे मंदिर आहे.  चामुंडा हिल समोर हा महाल दिमाखांत उभा  आहे. 

देश विदेशातील अनेक पर्यटक ह्या महालाला भेट देतात. ताजमहाल खालोखाल ह्या महालाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे .भारतांत ह्या बाबतीत ह्या महालाचा दुसरा क्रमांक लागतो. 

मुघल आक्रमणानंतर काही काळ हा महाल  टिपू सुलतानाच्या साम्राज्याची राजधानी होता. ही जागा नंतर परत  वाडियार राजाकडे आली आणि त्याने ह्या महालाचा कायापालट केला. वाडियार साम्राज्याच्या मालकीचा ,ऐतिहासिक महत्व असलेला हा राजवाडा १९१२ साली बांधून पूर्ण झाला. अंदाजे तेरा वर्षं हे बांधकाम सुरु होते.आणि त्यावेळी अंदाजे ४२ लाख रु. खर्च  आला होता. आजही महालाच्या काही भागांत राजपरिवाराचे वास्तव्य आहे . 

आता आम्ही महालांत प्रवेश केला. सुरवातीलाच समईंच्या ज्योतींच्या प्रकाशांत उजळलेल्या चामुंडा देवीचे दर्शन घेतले. नंतर एकेका दालनांत फेरफटका मारला. भूतकाळात राजाच्या  परिवाराने वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय पाहायला मिळते. 
महालांत पूर्वी वास्तव्य केलेल्या  राजांचे फोटो ,पेन्टिंग्स त्या राजांच्या वैभवाची साक्ष देतात.काही पेन्टिंग्स त्यांच्या Three -D Effect मुळे खूप जिवंत वाटतात. राजांचे पोशाख ,जडजवाहीर ,विविध वस्तू बघून डोळ्यांचे पारणे फिटते. विविध दालनांत मांडलेली सर्व स्मृतिचिन्ह चित्ताकर्षक आहेत . सर्व दालने प्रशस्त हवेशीर आहेत. स्टैन ग्लासचा वापर खिडक्या ,तावदाने आणि छतासाठी केलेला आहे.  महालांतील रंगसंगती ,कोरीवकाम ,हस्तिदंताचा  वापर करून चितारलेल्या ऐतिहासिक कथा ,त्यातही शेषशायी विष्णूची छतावरील कोरीव मूर्ती ,सगळेच विलोभनीय आहे. तिथल्या जवळपासच्या जंगलांत हत्तींचा भरपूर वावर असल्याने त्यांच्या अखंड सुळ्यांचा वापर सजावटीत  अनेक ठिकाणी केलेला दिसतो. शिकार करून मारलेल्या हत्तीची तोंडे मुखवट्यासारखी इथे भिंतीवर लावलेली आहेत.. 

चांदीच्या खुर्च्यांबरोबरच  ,८५ किलो सोन्याचा वापर करून  महाराजांना बसण्यासाठी केलेली ” Elephant  Seat ” पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे . राजेरजवाड्यांच्या विवाह समारंभासाठी खास  बनविलेला stain  glass  चा रंगीबेरंगी ” कल्याण मंडप ” सुद्धा प्रेक्षणीय आहे.एखादा लग्नसोहळा तिथे आत्ता सुरु आहे असा भास होतो.   त्याबरोबरच दरबार हॉल ,कुस्तीचा आखाडा सुद्धा विशेष  दर्शनीय आहेत. 

विविध कमानी ,संगमरवरी खांब,छतावर लटकलेली झुंबरं ह्यामुळे महालाचा सगळा  look एकदम भारदस्त वाटतो. 

ऐतिहासिक महत्व असलेल्या ह्या मानवनिर्मित वास्तूचे  गारुड मनांत  साठवतच काहीशा अनिच्छेनेच आम्ही ह्या महालाबाहेर पडलो. मर्यादित वेळेत एवढ्या सगळ्या गोष्टी बघणे कठीणच.  बाहेरच्या मोकळ्या विस्तीर्ण मैदानांतून  सलग ( २४५ ft. ) ह्या भव्य राजमहालाचे दर्शन घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.

दसरा पूजेनिमित्त प्रतिवर्षी इथे होणारी  भव्य मिरवणूक जगप्रसिद्ध आहे. हा एक प्रेक्षणीय  सोहोळा असतो. अनेक पर्यटक देश-विदेशातून ह्या सोहोळ्याला आवर्जून उपस्थित राहतात. दसऱ्यानिमित्त चामुंडा देवीची पालखी निघते.  राजघराण्यातील व्यक्ती ह्या मिरवणुकीत सहभागी होतात.  अनेक हत्ती ह्या मिरवणुकीत विविध  अलंकारांनी सुशोभित  होऊन हजेरी लावतात.  आम्हांला  प्रत्यक्ष हा अनुभव घेता आला नाही पण महालात लावलेल्या मिरवणुकीच्या पैंटिंग्स वरून ह्या शाही सोहोळ्याची थोडीशी झलक अनुभवता आली . जगभरातून ह्या मिरवणुकीला लाखोंची उपस्थिती असते. ह्या वेळी करण्यात येणाऱ्या  विद्युत रोषणाईने  डोळ्यांचे  पारणे फिटते.  . 

रोज  संध्याकाळी  विद्युत रोषणाईचा आणि लाईट साऊंड शो चा आनंद पर्यटकांना घेता येतो. पर्यटकांसाठी काही विशेष  सोयी इथे उपलब्ध आहेत.  विशेषतःअंध  व्यक्तींसाठी brail guide ची सोय आहे.  

भारतीय संस्कृतीच्या वैभवाला उजाळा देणारी अशी अनेक स्थळे आपला वारसा दिमाखाने जपत आहेत. पर्यटनाच्या निमित्ताने आपला पूर्वेतिहास पुन्हा आठवता येतो. तो जागविण्याचा थोडासा प्रयत्न  करता येतो. 

एखाद्या वास्तूचे सांस्कृतिक ,सामाजिक आणि ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन त्याची योग्य देखभाल व्हावी आणि हा वारसा पिढ्यांपिढ्या अबाधित राहावा म्हणून “ वारसा स्थळाची “ घोषणा सरकारतर्फे केली जाते. केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता  अशा वास्तूंचे योग्य प्रकारे जतन  करणे आणि आपला समृद्ध वारसा जोपासणे हे नागरिक म्हणून आपलेही  सर्वांचे उत्तरदायित्व आहे.  मानवी अतिक्रमणांपासून ह्या वास्तूंचे  योग्य सरंक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. ह्या वास्तूंची लोकप्रियता लक्षांत घेऊन पर्यटकांची प्रचंड वर्दळ इथे असते. त्याचा विपरीत परिणाम ह्या ठिकाणांच्या सौन्दर्यावर होऊ नये म्हणूनही काही उपाय योजावे लागतात. 

भावी पिढीला प्रेरणादायी ऐतिहासिक स्थळे दाखवून भविष्यात गौरवशाली  इतिहास निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करणे  हे सद्यस्थतीत आपले महत्वाचे कर्तव्य आहे.  सर्वानी मिळून ते  पुढे न्यायला  हवे. 

मैसूर चंदनासाठी सुप्रसिद्ध आहे. चंदन सुवासिक आणि पवित्र वनस्पती आहे. त्याचा दरवळ कायम रेंगाळत राहतो. जिभेवर स्वादिष्ट मैसूर वडीची  चव आणि चंदनाचा हा परिमळ  घेऊनच  आम्ही  मैसूरचा  निरोप घेतला आणि  कूर्ग कडे प्रयाण केले.

  • स्नेहा भाटवडेकर

       [email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu