गर्भाधान संस्कार म्हणजे काय ?

गर्भाधान संस्काराला ऋतुशांती संस्कार असेही म्हणतात.  गर्भाधान म्हणजे योग्य दिवशी,योग्य वेळी,पवित्र व मंगलमय वातावरणात आनंदी मनाने स्त्री-पुरुषांचे मिलन होऊन स्त्री चे गर्भाशयात गर्भाची बीज रुपाने स्थापना होणे.रजोदर्शनापासुन १६ रात्रींपर्यंत स्त्रियांच्या ऋतुकाळी गर्भसंभव होउ शकतो.या संस्कारासाठी ऋतुदर्शनापासुन पहील्या चार रात्री वर्ज्य कराव्या.अशुभ दिवस,ग्रहणदिवस,कुयोग त्या दिवशी असु नये. समरात्री संभोग केल्यास पुत्र व विषमरात्री संभोग केल्यास कन्या संतति होते, असा समज आहे.
हा संस्कार करताना प्रथम संकल्प, गणपती पूजन , पुण्याहवाचन , मातृका पूजन, नांदीश्राद्ध , प्रधानाज्य होम, अग्नी सूर्य यांचे स्थवन करून अश्वगंधा अथवा दुर्वा यांचा रस स्त्रीच्या उजव्या नाकपुडीत पिळला जातो. या नंतर स्त्रीची ओटी भरतात.  हा संस्कार विवाहानंतर प्रथम रजोदर्शन झाल्यापासून (मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून) पहिल्या सोळा रात्री, ज्यास ‘ऋतूकाल’ म्हणतात, त्या वेळी करतात. त्यांत पहिल्या चार, अकरावी आणि तेरावी रात्र सोडून शेष दहा रात्री या संस्कारास योग्य समजाव्या. कित्येकदा ‘चौथा दिवसही घ्यावा’, असे म्हणतात. गर्भाधानसंस्कारास चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, अमावास्या आणि पौर्णिमा या तिथी वर्ज्य कराव्यात. उर्वरित कोणत्याही तिथीस आणि सोमवार, गुरुवार, शुक्रवार या वारी, श्रवण, रोहिणी, हस्त, अनुराधा, स्वाती, रेवती, तिन्ही उत्तरा, शततारका या नक्षत्री उत्तम चंद्रबळ पाहून गर्भाधानविधी करावा. प्रकृतीतील प्रत्येक गोष्ट कालानुसार पालटत (बदलत) असते. केवळ ब्रह्म स्थिर असते. या नियमानुसार स्त्रीबीज फलित होणे, पुत्र किंवा कन्या होणे इत्यादी गोष्टीही काळानुसार पालटत असतात. या नियमानुसार कोणती तिथी, वार आणि नक्षत्र पुत्र किंवा कन्या होण्यास पूरक असते, हे निश्चित केले गेले आहे. 

१. ‘या संस्कारात विशिष्ट मंत्र आणि होमहवन यांद्वारे देहशुद्धी केली जाऊन त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या समागम करावा, असे मंत्राद्वारे शिकविले जाते. यामुळे सुप्रजाजनन, कामशक्तीचा योग्य वापर आणि कामाला घातलेला आवर, विटाळात समागम न करणे पासून ते समागमाच्या वेळी आसने आणि उच्च आनंद यांचे मार्गदर्शन केले जाते.

२. भगवंताच्या सृष्टीचक्राला गतीमानता देऊन सतत प्रसूतीचे कार्य करून सृष्टीचे कार्य चालू ठेवणारी ही प्रकृती आहे. त्यात मादीच्या स्वरूपाने कार्य ही सृजनशक्तीची देणगी आहे. मानवप्राण्यात स्त्री प्रजानिर्मितीचे कार्य करते. उत्तम प्रजेची निर्मिती आणि तिचे संगोपन होणे आवश्यक आहे. या दृष्टीने सोळा संस्कारांत गर्भदानाला फार महत्त्व आहे. सुप्रजा सिद्धांताप्रमाणे योग्य गर्भधारणेच्या दृष्टीने गर्भधारणेच्या अगोदर पिंडशुद्धी होणे आवश्यक असते; कारण चांगल्या बीजशक्तीमुळेच चांगली संतती निर्माण होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी ।’

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

३. `भागवतात आठव्या स्कंधात ‘पयोव्रत’ सांगितले आहे. त्याचे तात्पर्य असे की, मुलाला जन्म देण्याच्या दृष्टीने संयमित जीवन, सात्त्विक आहार आणि भोगविमुक्त विचार या गोष्टी सांभाळून रहाणार्‍या दांपत्याच्या पोटी तेजस्वी संतती जन्म घेते. अदितीने हे पयोव्रत केले होते; म्हणून तिच्या पोटी वामन अवतार झाला. स्त्री हीच राष्ट्राची जननी आहे. तिने या संदर्भात जास्त जागृत रहावे, यासाठी गर्भाधान संस्कार आहे.’

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu