पावसाळ्यात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काही घरगुती उपचार
पावसाळा, म्हणजे आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेण्याचा काळ. पावसाळ्यात अग्नी मंद होत असल्याने पचन खालावते, वात वाढतो, त्यामुळे शरीरशक्ती कमी होत असते. शिवाय पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. या गोष्टी लक्षात घेता पावसाळा सुरू झाला की त्रास होण्यापूर्वीच काही घरगुती उपचार करणे इष्ट असते.
* गवती चहा, आले, तुळशी, दालचिनी यांच्यासह उकळलेल्या पाण्यात चवीनुसार साखर टाकून पावसाळ्यात रोज एकदा घेणे चांगले असते. यामुळे जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो व पचनशक्ती चांगली राहण्यास मदत मिळते.
* ओवा, तीळ, ज्येष्ठमध, सैंधव वगैरे द्रव्यांपासून बनविलेली सुुपारी पावसाळ्यात जेवणानंतर खाणे हितावह असते, याने पचनाला मदत होते.
* पावसाळ्यात पुदिना हे सुद्धा मोठे घरगुती औषध आहे. जेवणात पुदिन्याची ताजी पाने, काळी द्राक्षे, जिरे, हिंग, सैंधव, मिरी यापासून बनविलेली चटणी खाण्याचा उपयोग होतो. याने तोंडाला रुची येते, शिवाय पचनास मदत मिळते.
* दुपारच्या जेवणानंतर किसलेले आले व पुदिन्याचा रस टाकून ताक घेण्यानेही पचन व्यवस्थित राहण्यास मदत मिळते. विशेषतः जुलाब, आव वगैरे त्रासांना प्रतिबंध होतो.
* पावसाळ्यात वातदोष वाढतो. वात वाढला की त्यापाठोपाठ दुखणेआलेच. संधिवात, आमवात वगैरे दुखणे असणाऱ्यांना याचा अनुभव येतोच. अशा व्यक्तींनी व इतरांनीही पावसाळ्यात सुंठ-गूळ-तूप यापासून बनविलेली लहान सुपारीच्या आकाराची गोळी घेणे चांगले असते. याने वातदोष नियंत्रित होण्याबरोबर पचनालाही मदत मिळते.
* पावसाळ्यात भूक लागत नसली, पोट जड वाटत असले, गॅसेस अडकून राहिले आहेत असे वाटत असले तर लिंबू व आल्याच्या रसाच्या मिश्रणात थोडी जिरे पूड व सैंधव टाकून तयार केलेले चाटण थोडे थोडे चाटणे उत्तम असते.
* हिंगाष्टक नावाचे चूर्ण पावसाळ्यात उत्तम होय. त्रास असो वा नसो, प्रकृतीनुसार पाव ते अर्धा चमचा चूर्ण व थोडेसे तूप भाताच्या पहिल्या घासाबरोबर घेण्याने भूक लागायला मदत होते, अन्न व्यवस्थित पचते.
* पावसाळ्यात तेल लावून गरम पाण्याने स्नान करणे हितावह असते. वातशामक द्रव्यांनी सिद्ध केलेले तेल वापरणे अधिक हितावह असते.
* जंत होऊ नयेत व झालेले जंत नष्ट व्हावेत यासाठी उपाययोजना करणे एरवीही चांगले असते. पावसाळ्यात मात्र याकडे विशेषतः द्यावे लागते. त्यादृष्टीने महिन्यातून आठ दिवस सकाळी चमचाभर वावडिंगाचे चूर्ण मधासह घेणे चांगले असते. कढीलिंबाची ताजी पाने वाटून केलेली गोळी अधून मधून घेण्याचाही उपयोग होतो.
* पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असते. यास प्रतबंध होण्याच्या दृष्टीने घर, ऑफिस, दवाखाने वगैरे सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे धूप करणें उत्तम असते. यासाठी कडुनिंबाची पाने, वावडिंग, कापूर, ऊद वगैरे द्रव्यांचे मिश्रण वा तयार ‘संतुलन प्युरिफायर धूप’ वापरता येतो.
पावसाळ्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी येणाऱ्या शरद ऋतूत पुन्हा एकदा पित्त वाढत असते किंबहुना पित्ताचा प्रकोप ह्याच काळात होत असल्याने उन्हाळ्यात घ्यायची काळजी पुन्हा या दिवसात घेणे आरोग्यरक्षणासाठी चांगले असते.
– संकलित