संस्कृती © सौ. मानसी मंगेश सावर्डेकर.

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुडीपाडवा साजरा केला जातो . चैत्र् शुद्ध पहिल्या दिवसा पासून हिंदूचे नववर्ष आरंभ होते. ह्या दिवशी महाराष्ट्रामध्ये घरोघरी गुडी उभारून हा सण साजरा करतात. ह्या दिवशी घरासमोर सडा घालून रांगोळी घालतात, देवाची पूजा करून महानैवेद्द करतात. देवाजवळ नवीन वर्ष सुख, समृद्धीचे, चांगले आरोग्याचे जावे म्हणून प्रार्थना करतात. गुडी उभारतांना काठीला वरच्या बाजूला रेशमी वस्त्र, कडू लिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार व साखरेची गुडी बांधून वरती चांदीचा किवा तांब्याचा कलश लावावा. कलशा वरती कुंकू ओले करून स्वस्तिक काढावे. व गुडी दरवाजाच्या बाजूला लावावी. ती जागा स्वच्छ धुवून घ्यावी त्यावर रांगोळी काढावी मग वरती गुडी बांधावी. गुडीला गंध, अक्षदा, फुले वाहून पूजा करावी व आरती करावी व नेवेद्य म्हणून दुध-साखर अथवा पेढा ठेवावा. दुपारी गोडाचा नेवेद्य दाखवावा.

गुडी पाडवा ह्या दिवसाला वर्ष प्रतिपदा असे सुद्धा म्हणतात. चैत्र् शुद्ध पहिला दिवस साडेतीन मुहूर्तातला एक महत्वाचा दिवस मानला जातो. ह्या दिवशी आरोग्य प्रतिपदा व्रत, विद्याव्रत व तिलव्रत करावे म्हणजे आपले आयुष्य सुखाचे जाते असे म्हणतात. हा दिवस पूर्ण दिवस शुभ मानला जातो. ह्या दिवशी सोने खरेदी करतात, नवीन वस्तू, नवीन वास्तू घेतात, नवीन वाहन घेतात, नवीन घरात प्रवेश करतात.
 
गुडी पाडवा ह्या दिवशी प्रभू रामचंद्र १४ वर्षाचा वनवास संपवून आयोध्येत आले तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आयोध्येतील प्रजेनी गुड्या उभारून प्रभू रामचंद्राचे स्वागत केले. गुडी उभारण्या मागचा कारण म्हणजे आनंद, स्वागत व विजय ह्याचे प्रतीक आहे.
 
चैत्रामध्ये झाडांना नवीन पालवी येते व श्रुष्टी हिरवी गार दिसते. ह्या दिवशी कडुलिंबाची पाने खावीत त्यामागचे हेतू हा की कडुलिंबाच्या पाने खाल्याने आपली पचनशक्ती चांगली होते. 
गुढीपाडव्यानंतर जी चैत्र शुद्ध तुतीच्या येते , त्या दिवशी चैत्र गौरीचे आगमन होते, ते थेट अक्षय तुतीये पर्यंत असते. 
 चैत्र सुरु झाला आहे. चैत्रातील नऊरात्र अनेक ठिकाणी सजल आहे. पहिल्या दिवशी गौरीला न्हाऊ – माखू घालायचे, तिला हिंदोळ्यावर (पाळण्यात) बसवायचे, तिच्यातीच्यासमोर कुंकवाचा करंडा उघडा ठेवायचा, छोटे तांब्याभांडे पाण्याने भरून ठेवायचे. दररोज पंचोपचार पूजन करायचे, ज्या दिवशी गौरीचे आगमन होते त्या दिवशी घरात गोडधोड करायचे. तिची खणानारळाने ओटी भरायची गौरी ही माहेरवाशीण असते, त्यामुळे तिचे योग्य स्वागत करायचे, त्या दिवशी आपल्या घरातील लग्न करून गेलेल्या मुलीला घरी जेवायला बोलवायचे. तिचे योग्य स्वागत करायचे. ती सासरी निघताना तिची ओटी भरून, तिला भेट वस्तू द्यायची. 
गौरीपुढे याकाळात विविधप्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात या रांगोळ्यांना चैत्रांगण असे म्हणतात 

           अक्षय तृतीये पर्यंत कोणत्याही एका दिवशी हळदीकुंकू समारंभ करायचा. त्या दिवशी सगळ्यांना भिजवलेले हरभरे, खिरापत, आंबेडाळ व कैरीचे पन्हे द्यायचे. उतरंडीची आरास करायची. आरास करताना पहिल्या पायरीवर देवी म्हणजेच गौरी (अन्नपूर्णा) ठेवायची त्याच्या खालच्या पायरीवर भिजवलेले हरभरे, खिरापत, आंबेडाळ व कैरीचे पन्हे ठेवायचे. 

          त्याखाली सगळे पदार्थ (कुरडया , शेव, चकली, शंकरपाळे, अनारसे) करून ठेवायचे, त्याखालील पायरीवर, खेळण्यांची किंवा आपल्याला आवडीची आरास करायची. किमान चार ते पाच पायऱ्या व्हायला हव्यात.रात्री गौर जागवून झिमा, फुगडी खेळ खेळले जातात. जर मध्ये कधी जमलं नाही तर अक्षय तृतीयेला हळदीकुंकू समारंभ करावा, अक्षय तृतीयेच्या दिवशी सगळे गोडाचे पदार्थ बनवून नैवेद्य दाखवायचा. देवीचे विसर्जन करायचे नाही, दुसऱ्या दिवशी दररोजच्या देव्हाऱ्यात देवीला ठेऊन द्यायची. 

 
©सौ. मानसी मंगेश सावर्डेकर.
नौपाडा ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu