नारायण श्रीपाद राजहंस – बालगंधर्व
नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांचा जन्म दि.26 जून 1888 रोजी नागठाणे सांगली येथे झाला . सहज सुंदर अभिनय आणि केवळ गंधर्वांबरोबरच तुलना होऊ शकेल असा आवाज , म्हणूनच लोकमान्य टिळकांनी छोट्या नारायणाला ‘ बालगंधर्व ‘ ही उपाधी दिली . बालगंधर्व भास्कलाबुवा बखले यांचे शिष्य होते . मास्टर कृष्णराव बालगंधर्वांचे गुरुबंधू . नाट्यगीतासह बालगंधर्वांचे ख्याल , ठुमरी , गझल , दादरा , भाक्तिगीते यांसारख्या गायनप्रकारांवरही विलक्षण प्रभुत्व होते . रंगभूमीवर स्त्रिया आभिनय करत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहूब रंगवलेल्या स्त्री भूमिकांमुळे बालगंधर्वांना मोठी लोकप्रियता लाभली होती . खरं तर बालगंधर्वांना गायक व्हायचं होतं पण नियतीला त्यांचा गाणारा नाट्यकलाकार मंजूर होता .
इ.स.1905 सालापासून बालगंधर्वांची रंगभूमीवरील कारकीर्द सुरू झाली . किर्लोस्कर संगीत मंडळी मधून बालगंधर्वांनी आपल्या नाट्यसेवेची सुरूवात केली . इ.स.1911 मध्ये नानासाहेब जोगळेकर यांच्या निधनानंतर किर्लोस्कर संगीत मंडळी विस्कळीत झाली . इ.स.1913 साली बालगंधर्वांनी ‘ गंधर्व संगीत मंडळी ‘ ची स्थापना केली . गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे बालगंधर्वांच्या गंधर्व संगीत मांडळीत दाखल झाले . इ.स.1921 साली ही कंपनी कर्जात अडकली होती . पुढील सात वर्षात बालगंधर्वांनी ही सर्व देणी फेडली . आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बालगंधर्वांच्या नाटकांना जबरदस्त यश लाभले . पण त्या पुढेही या संस्थेची आर्थिक स्थिती कायमच चढ उताराची राहिली . नाटकाच्या प्रॉपर्टीसह अनेक गोष्टींमध्ये अस्सलता राखण्यासाठी बालगंधर्व वारेमाप खर्च करीत . त्या बाबतीत ते आग्रही होते . परिणामस्वरुपी संस्थेची आर्थिक स्थिती कायमच चढ उताराची असे . प्रभात फिल्म कंपनीसाठी बालगंधर्वांनी धर्मात्मा चित्रपटात संत एकनाथांची भूमिकाही केली होती .
संगीत सौभद्र , संगीत मृच्छकटिक , संगीत शाकुंतल , संगीत मानापमान , संगीत संशयकल्लोळ , संगीत शारदा , संगीत मूकनायक , संगीत स्वयंवर , संगीत विद्याहरण , संगीत एकच प्याला अशा एकाहून एक सरस पंचवीस नाटकात बालगंधर्वांनी भूमिका केल्या . शाकुंतलातील शकुंतला , मानापमानातील भामिनी , एकच प्यालातील सिंधू या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या भूमिका . इ.स.1955 मध्ये एकच प्याला मध्ये त्यांनी साकारलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली . त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली . उतरतं वय तसेच स्त्री भूमिकेसाठी स्त्री पात्रांची उपलब्धता या गोष्टींमुळे रसिकांनी बालगंधर्वांना शेवटी नाकारले . नाट्य रसिकांचा उल्लेख बालगंधर्व नेहमीच मायबाप असा करीत . बालगंधर्वांची सर्वोत्कृष्ट भूमिका कोणती या सर्वेक्षणात एकच प्याला मधील सिंधूने बाजी मारली होती . रसिकांनी सर्वात जास्त पसंती सिंधूला दिली होती .
महात्मा गांधी , लोकमान्य टिळक , पंडित नेहरू , राजर्षी शाहू महाराज डॉ. आंबेडकर या महापुरुषांना आपल्या आवाजाने विसावा देऊन मंत्रमुग्ध करणारे सुरांच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट म्हणजे बालगंधर्व !
केसरी या वर्तमानपत्राकडून गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता . नारायणास या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळाली होती . त्या कार्यक्रमात ‘ हरवा मोरा देव बंधना ‘ तसेच ‘ ना तर मै गारी दुंगी , ना रहुंगी तुम्ही सो बलमा ‘ ही गीते त्यांनी गायली होती . त्यांचा आवाज , गायकी बघून लोकमान्य फारच प्रभावित झाले होते . उत्स्फूर्तपणे लोकमान्यांनी नारायणास ‘ बालगंधर्व ‘ ही पदवी बहाल केली . नारायणराव पुढे बालगंधर्व या नावानेच प्रसिद्ध झाले .
बदलत्या काळानुसार लोकांनी रंगभूमीकडे पाठ फिरवली . लोकांचा कल सिनेमाकडे झुकला . व्ही शांतारामांच्या आग्रहाने बालगंधर्वांनी प्रभात कंपनीच्या ‘ धर्मात्मा ‘ या सिनेमातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले . पण रंगभूमीवरील स्त्री भूमिकेतील बालगंधर्वांना प्रेक्षकांनी स्विकारले नाही . पत्नी लक्ष्मीबाईंचे निधन झाल्यानंतर त्यांनी नाटकातील जोडीदार गोहर कर्नाटकी यांच्याशी कायदेशीर विवाह केला . पण तो काही फारसा यशस्वी झाला नाही . कारकीर्दीच्या अखेरच्या काळात बालगंधर्वांना अत्यंत हालाखीचे दिवस कंठावे लागले . भजन , कीर्तन प्रसंगी तंबोरा धरूनही पैसे मिळवावे लागले . जिथे फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचण्याचा प्रसंग ओढवला .
रंगभूमीवरील एक काळ ज्यांच्या नावाने गंधर्वयुग म्हणून ओळखला जातो असे बालगंधर्व म्हणजे मराठी रंगभूमीला पडलेले इंद्रधनुषी स्वप्न होते .
असा बालगंधर्व आता न होणे !


