वसंत-वैभव
पावसाळ्यातली अशीच एक संध्याकाळ. पावसाच्या झडी पासून बचाव व्हावा म्हणून सहा – सात वर्षांचा मुलगा एका इमारतीच्या जिन्यात आपल्याच तंद्रीत गुणगुणत उभा होता. त्याची तंद्री भंग पावली ती त्याच्या खांद्यावर अचानक थबकलेल्या हाता मुळे. सकृद्दर्शनी अति सामान्य वाटणारी ही घटना. पण ती संध्याकाळ विशेष होती आणि घटनाही. त्या संध्याकाळी घडलेल्या या घटनेच्या गर्भात अखिल भारतीय कीर्तीचा तेजोमयी गंधर्व घडवणारं बीज होतं…… .होय तो खांद्यावर थबकलेला हात होता, ग्वाल्हेर घराण्याचे गायक, नागपुरातील श्रीराम संगीत विद्यालयाच्या श्री शंकरराव सप्रे यांचा आणि ज्याच्या खांद्यावर तो हात पडला तो खांदा होता भविष्यात अलौकिक प्रतिभेचा, संगीत क्षेत्राला ललामभूत ठरलेल्या स्वराधीश डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

त्या संध्याकाळी सप्रे गुरुजींच्या पारखी/तयार कानांवर छोट्या वसंताचे गुणगुणणे पडले आणि ते इतके मोहित झाले की त्याला वरती घेऊन गेले आणि नाव-गाव वगैरे चौकशी करत गाणं कुणी शिकवलं आणि कुठली गाणी येतात म्हणून चौकशी केली. आपल्या गोड गळ्याच्या आई कडून भजने, नाट्य-गीत शिकलेल्या वसंताने मृच्छकटिक नाटकातील ‘जन सारे मजला म्हणतील की’ हे पद आणि अन्य गाणी म्हणून दाखवली. शंकरराव खुश झाले. ते वसंताला सोडायला नागपुरातल्या महाल भागातल्या तेलीपुऱ्यातल्या घरी गेले आणि हा मुलगा मला द्या अशी वसंताच्या आई कडे मागणी केली. बेताच्या परिस्थिती मुळे फी देणे परवडणार नाही असं आईने म्हणताच….. फी चा प्रश्नच नाही मुलगा माझ्या स्वाधीन करा अशी विनंती शंकररावांनी केली. शाळा न सोडण्याची आईची अट आणि गाणे शिकायला दुसऱ्या कुणाकडेही पाठवायचे नाही ही शंकररावांची अट मान्य झाली……. छोट्या वसंताची तालीम श्रीराम संगीत विद्यालयात सुरू झाली आणि ती लाहोरला असद अली खां यांचा गंडा बांधून तीन- चार महिने सतत मारवा गिरवून पूर्ण झाली.

श्रीराम संगीत विद्यालयात शिकत असतानाच वसंतराव आणि त्यांचे सहाध्यायी राम चितळकर (सी रामचंद्र) नागपूरात बर्डी वरच्या रिजंट टॉकीज मध्ये त्यावेळच्या मूक चित्रपटांच्या पार्श्वसंगीता साठी अनुक्रमे तबला आणि हार्मोनियम वाजवायला जात. वसंतरावांच्या मामाची बळवंत संगीत मंडळीत उठबस होती. मामा बरोबर वसंतरावांनी बरीच नाटके बघितली आणि त्यांचे लक्ष मास्टर दीनानाथांच्या गायकी कडे वेधले गेले. मास्टर दीनानाथ यांनी वसंता कडून ‘शुरा मी वंदिले’, ‘जिंकिते जगी ती’ आणि ‘परावशता पाश दैवी ‘ ह्या पदांची तालीम स्वतः हुन करून घेतली. वसंताला आवडीची गायकी शिकण्याचे स्वातंत्र्य शंकररावांनी दिले होते. कुठली गायकी शिकायची हा पेच लाहोरच्या दुसऱ्या मामाने सोडवला. वसंतराव लाहोरला गेले शाळेत दाखल झाले आणि मामाच्या ओळखीच्या अनेक खां साहेबांची गायकी ऐकली तिथल्या शाळेतल्या खन्ना नावाच्या मित्राने रावी नदी पल्याडच्या शहादऱ्यात (जहांगीर ची कबर) रहाणाऱ्या फकिरा कडे नेले. हेच ते असद अली खां ज्यांनी वसंतरावांकडून विहिरीच्या काठावर बसून फक्त मारवाच तीन महिने घोटून घेतला. तो असा शिकवला की सर्वच रागांचे दर्शन झाले. मारवा गळ्यावर नीट चढल्यानंतर ते उण्या पुऱ्या एकोणीस वर्षांच्या वसंताला म्हणाले, ‘जा तू आता गवई झालास. एक राग तुला आला; तुला आता सगळं संगीत आलं.” पुढे म्हणाले, ‘एक साधे तो सब साधे, सब साधे तो कुछ नाही साधे.” आणि वसंताचा… वसंतराव…..डॉक्टर वसंतराव होण्याचा मार्ग प्रशस्त झाला.
वसंतराव यांच्यावर संगीताचे बहुमुखी संस्कार झाले. त्यांना खऱ्या अर्थाने संगीत तज्ञ म्हणता येईल, कारण संगीत म्हणजे गायन, वादन आणि नर्तन. या तीनही विधांवर त्यांची चांगली पकड होती. इतकेच नव्हे तर ते उत्तम नकलाकारही होते असा उल्लेख माझ्या वाचनात आला आहे.

चरितार्था साठी ते मिलिटरी अकाउंट्स मध्ये कारकुनाची नोकरी करत होते यावर चटकन कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण ते सत्य आहे. मी अस ऐकलंय की वसंतरावांना गुणगुणतांना किंवा रियाझ करतांना कुणीही फारस पाहिलं नाही. सुरवातीला त्यांचं घरही इतकं लहान होत की त्यात तानपुरा ठेवायलाही जागा नव्हती. गत जन्मी रियाझ करून, साक्षात परमेश्वराची अनुभूती देणार गाणं सादर करण्यासाठीच त्यांचा हा जन्म झाला होता बहुदा.
माझे घराणे माझ्यापासूनच सुरू होत किंवा लोकांना कळावं की मी तालात गातो आहे, म्हणून मी तबलेवाला साथीला घेतो यासारखी विधाने अन्य कुणी गायकाने केली असती तर ती निखळ अहंकारोक्तीच म्हटली जाईल, मात्र वसंतरावांचा वकुबच असा होता की ही वाक्यें त्यांचा मुखी सहज शोभून दिसली, शालीनच वाटली. दुसरीकडे आपण थोर गायक आहोत ह्या अहंकाराचा लवलेश ही स्पर्श होऊ न देता, गानतपस्वी हिराबाई बडोदेकरांचा परदेश दौरा त्यांच्या तबलजीच्या आजारपणामुळे रद्द करावा लागू नये म्हणून, त्यांच्या बरोबर स्वतः तबलजी म्हणून वसंतरावांनी दौरा केला. हिराबाईं कडच्या खाजगी बैठकीत सतरंज्या घालायला देखील त्यांनी कधी कमीपणा मानला नाही. नवख्या साथीदारांना सांभाळून घेण्याच दुर्मिळ औदार्य त्यांच्या ठाई होत. सहकलाकारांच्या बाबतही तीच वृत्ती. मेघमल्हार नाटकाचे सर्वेसर्वा राम मराठे होते आणि त्यांच्या मित्राच्या भूमिकेत वसंतराव. तालमी दरम्यान रामभाऊंच्या आई आजारी झाल्या आणि त्यांना संगीत दिग्दर्शनासाठी वेळ कमी पडू लागला. तेंव्हा वसंतरावांनी स्वतःची पद स्वतः बसवली मात्र संगीत दिग्दर्शक म्हणून एकट्या रामभाऊंच नाव देण्याची सूचना वसंतरावांनी सहजपणे करून विलक्षण परिचय दिला.
संगीत नाटकांना पुन्हा नवसंजीवनी देणाऱ्या कलाकृतीं मध्ये ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकाची भूमिका फार मोठी आहे. आपल्या बहारदार गायनाने आणि चपखल अभिनयाने वसंतरावांनी या नाटकाच सोन केल.

खां साहेबांच्या भूमिके साठी वसंतराव ही पहिली पसंती नव्हती यावर मात्र कुणाचा विश्वास बसणे अवघड आहे. या संदर्भात नाटकाचे निर्माते प्रभाकर पणशीकर यांच्या कडून मी ऐकलेला किस्सा असा……….
खां साहेबांच्या भूमिकेसाठी सर्वप्रथम त्यावेळचे गायकनट प्रसाद सावकार यांना पणशीकरांनी विचारले. त्याकाळी अभिनयासाठी मिळणाऱ्या बिदागी च्या बरोबरीने किंवा त्यापेक्षाही अधिक रक्कम मराठी नाट्यसंगीताच्या ध्वनिमुद्रिकांच्या मार्फत होत असे. कट्यार मध्ये एकही पद मराठी नसल्याने प्रसाद सावकारांनी हे नाटक नाकारल. नंतर राम मराठे यांचं नाव पुढे आलं. मात्र त्यांच व्यक्तिमत्व, कितीही मेकअप केला तरी खां साहेबांच्या भूमिकेला सुसंगत दिसणार नाही हे लक्षात आल्याने पुन्हा शोध सुरू झाला. त्यावेळी कुणीतरी पणशीकरांना वसंतराव यांचे नाव सुचविले. त्यांना विचारण्यासाठी पणशीकर पुण्यास गेले मात्र वसंतराव मुंबईत असल्याचे समजल्याने त्यांनी वसंतरावांची मुंबईत भेट घेतली आणि आपण संगीत नाटक करतो आहोत असे सांगताच वसंतराव त्यांना म्हणाले की, “तुमचा आणि संगीताचा काय संबंध?” त्यावर आपण निर्माता असल्याचा खुलासा पणशीकर यांनी केला आणि संगीत अभिषेकी बुवा करणार असल्याचे सांगत नाटकाचे बाड त्यांच्या कडे दिले. यावर वसंतराव म्हणाले, “बाड ठेऊन जा. वाचतो, आवडले तर उद्या गिरगावात तालमीला येतो आणि आलो नाही तर हे बाड परत घेऊन जाण्याची व्यवस्था करा”. समस्त मराठी संगीत नाटक रसिकांचे नशीब बलवत्तर म्हटले पाहिजे, वसंतराव तालमीला हजर झाले. पुढे काय झाले ते सर्वांना माहीतच आहे. खां साहेबांच्या भूमिकेत वसंतरावांनी असा काही प्राण ओतला की कट्यार आणि ते द्वैत न राहता अद्वैत होऊन गेले.
डॉ.वसंतखाँ देशपांडे – सुरत पिया की
डॉ. वसंतराव देशपांडे – तेजोनिधी लोहगोल
या अव्वल शास्त्रीय संगीत गायकला सर्वसामान्य रसिक मान्यता मिळण्यासाठी कट्यार चे निमित्त झाले हे मात्र कुठेतरी खटकते. ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात, वसंतरावां बरोबर काट्यारचे कित्येक प्रयोग केलेल्या श्रीमती फैयाज यांनी सांगितलं की प्रयोगागणिक गायकीच्या वेगवेगळ्या छटा दाखवत खां साहेबांची पदं वसंतराव सादर करायचे… आजची पदं कालच्या पेक्षा नवीन असायची. एवढंच नव्हे तर अनेक स्त्री सुलभ मुरके जे स्त्री असूनही त्यांना कठीण जात ते वसंतराव साभिनय शिकवत.
वसंतराव चतुरस्त्र आणि बहुमुखी प्रतिभेचे धनी होते. त्यांच्या गायकीचे पु. ल. देशपांडे यांनी यथार्थ वर्णन केल आहे . ते म्हणतात ” वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नाही. दऱ्याखोऱ्यातून बेफाम दौडत जाणाऱ्या घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर उन्हाळ्यात पालशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी. ती फुले पाहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी.” अस म्हणतात की नागपुरातल्या ताजुद्दीन बाबांनी वसंतरावांच्या आईला सांगितले होते की याच्या पश्चात पन्नास वर्षांनी आपण काय गमावले ते लोकांना कळेल. खरोखरच वसंतरावांना रसिकमान्यता मिळण्यास फार उशीर झाला. पण त्यामुळे त्यांच्यापेक्षा सर्वसामान्य रसिकांचेच फार मोठे नुकसान झाले. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्टपणे पु. ल. देशपांडे यांना सांगितली होती, ते म्हणतात “अरे भाई, मान मान क्या बात है! सुरांची दौलत गळ्यात असल्यावर गळ्याबाहेर नाही पडला हार तर बिघडलं कुठे?” असा हा निर्मोही, निरहंकारी, अवलिया गायक! आचार्य अत्रे यांच्या शैलीत सांगायचं तर पुढच्या दहा हजार वर्षात असा गायक होणे नाही. संगीताच्या मांडवात कानसेन म्हणूनही खरंतर मी मिरवू शकत नाही. प्रभाताई अत्रे, वसंतराव यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून स्वर, ताल यांची गोडी निर्माण झाली आणि सुरांच्या ह्या दुनियेत शिरकाव तरी झाला. वसंतरावांच व्यक्तिचित्र रेखाटताना आपण कितीतरी कमी पडत असल्याची भावना मनात होती. ती कमतरता दूर करण्या साठीच की काय अगदी अवचित पणे माझ्या हाती आलेली, आपापल्या क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती असलेल्या एका कार्यक्रमाची संपादित AV श्रवणभक्ती साठी वाचकांच्या सुपूर्द करतो. रामकृष्ण बाक्रे यांनी ‘गान सरोवरातील ब्रह्म कमळ’ अशी सार्थ उपमा दिलेल्या या अवलीयाच्या चिरमृतींना विनम्र भवांजली.
डॉ. वसंतराव देशपांडे – सुकतातची जागी या
डॉ. वसंतराव देशपांडे – भैरवी
सौजन्य: राहुल देशपांडे, YouTube
वसंतराव देशपांडे स्मरणिका
नितीन सप्रे,
nitinnsapre@gmail.com
8851540881
pc:google
टीप: लेखक श्री नितिन सप्रे हे भारतीय माहिती सेवेतील अधिकारी असून सध्या भारत सरकारच्या डी.डी.न्युज,(दूरदर्शन) नवी दिल्ली येथे उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत. लेखातील मते त्यांची व्यक्तीगत आहेत.
त्यांचे लिखाण https://saprenitin.blogspot.com या ब्लॉगवरही उपलब्ध आहे.
- संपादक.


